माझे वडील कै. साहेबराव(दादा) चंद्रभान देशमुख यांचा साहेबां सोबतचा परिचय १९७४ पासूनचा, त्यावेळी साहेब बाभळगावचे सरपंच तथा लातूर पंचायत समितीचे उपसभापती व आमचे वडील गोंदेगावचे सरपंच होते.
तसा साहेबांचा स्वभाव हा अगदी सुरवातीच्या काळापासूनच मनमिळाऊ,मितभाषी होता. साहेबांचे मित्र कै.बब्रुवान काळे यांच्याकडे राजदूत होती, त्यांच्या गाडीवर बसून साहेब नेहमी लातूरच्या ग्रामीण भागात फिरायचे. आमचे वडील वारकरी संप्रदायाला मानणारे होते. पंचायत समितीत साहेबांशी व मित्र परिवाराशी गप्पा मारत असताना ग्रामीण भागातील विविध अडचणी विषयी जाणून घ्यायचे.१९७६ साली बी.व्ही. काळे, शहाजीराव मुळे व अन्य मित्र मंडळीना सोबतच साहेबांना देखील शेतामध्ये स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिले होते.उन्हाळी दिवसात स्नेहभोजन आयोजित केल्यामुळे पावसाची शक्यता नव्हती,मात्र अचानक वातावरणात बदल झाला व अवकाळी पावसाच्या सरी सुरु झाल्या परंतु अशा परस्थितीत ही साहेबानी राजदूत गाडीवर प्रवास करून आमंत्रनास हजेरी लावली व येण्याबद्दलचा शब्द पाळला आणी मिश्किलपणे म्हणाले “माळकरी आलो की नाही तुमच्या मेजवानीला”.
आपल्या गावाकडची, लातूरची माणसे म्हंटली की साहेब मुंबईत कितीही कामात व्यस्त असले तरी ही त्यांना आवर्जून भेटायचे,वेळ द्यायचे. माझ्या वडिलांना (दादांना) १९८३ साली कॅन्सर डीटेकट झाला व त्यांना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटल, ताडदेव रोड, मुंबई येथे उपचारासाठी भरती करण्यात आले, उपचार झाल्यानंतर गावाकडील मंडळी दादांना गावाकडे परत नेण्यासाठी मुंबईला आली. परंतु सुट्टी होण्यासाठी दोन दिवस बाकी होती, त्यामुळे गावाकडील मंडळी साहेबांना त्यांच्या मुंबईच्या घरी भेटण्यास गेली. त्यावेळी दादाना कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबई येथे आणल्याचे साहेबांना कळताच त्यांनी सदरील डॉक्टरांना त्वरित संपर्क केला व उपचाराबद्दल सविस्तर माहिती घेऊन योग्य ती काळजी घेण्यास सांगितली, तसेच गावाकडील मंडळीना एका पोलीस उप निरीक्षकासह चारचाकीची उपलब्धता करून पुढची सोय केली.
साहेबांसोबतच्या अशा असंख्य आठवणी सोबत आहेत. साहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते ते पक्के राजकारणी कधीच नव्हते.आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं.आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे समाजाच्या सगळ्या थरांमधून असंख्य मित्र आणि अनुयायी त्यांच्याशी जोडले गेले.
- श्री.बळवंतराव साहेबराव देशमुख