विलासराव देशमुख यांची आणि माझी ओळख १९८० च्या सुमारास झाली. तेंव्हा ते नुकतेच आमदार झाले होते. त्यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या सुख-दुःखाची अचूक जाण त्यांना होती. ते उमद्या मनाचे नेते होते. मी १९८३ ला औरंगाबाद येथे तरुण पत्रकारांसाठी तीन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. माहिती खात्याचे राज्यमंत्री असलेले विलासराव देशमुख कार्यक्रमाचे उद्घाटक होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंदराव किर्लोस्कर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठवाडा दैनिकाचे संपादक कै. अनंतराव भालेराव होते. त्यावेळी मी त्यांचे भाषण प्रथमच ऐकले.
पत्रकारिते विषयी त्यांनी जे मार्मिक भाषण केले, ते आजही आठवते. त्यानंतर बोलताना मुकुंदराव किर्लोस्कर, देशमुख साहेबांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करत असल्याने मी त्यांना सांगितले की, हे माहिती खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यावर मुकुंदराव म्हणाले, अरे होतील की मुख्यमंत्री. त्यावेळी आनंतराव भालेराव म्हणाले, 'माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, लवकरच मुख्यमंत्री व्हा' विलासरावजी महत्त्वाकांक्षी होते. त्यांना मराठवाड्याचा अभिमान होता. शिक्षण मंत्री असताना त्यांनी शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आग्रहाने प्रथमच मुंबई बाहेर लातूरला घेतला होता. त्यावेळी राज्यपाल होते, शंकर दयाळ शर्मा. योगायोगाने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली होती. अशीच एक सुंदर आठवण श्रीनिवास खळे यांना लोकमत दैनिकाने दिलेल्या पुरस्काराच्या वेळेची आहे. ते म्हणाले होते. खळं आम्हा शेतकऱ्यांना माहीत आहे, चंद्राभोवती खळे आम्हाला माहित आहे, शेतात पीक काढल्यावर उभारलेल्या धान्याच्या राशीचे खळे माहित आहे. पण खळे साहेब तुम्ही संगीत-विश्वात निर्माण केलेले अद्भुत खळे मात्र कल्पनातीत आहे. एकदा सर्व सचिवांची बैठक मंत्रालयात होती. पुढील पाच वर्षासाठीचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत होते. प्रत्येक सचिव डोळ्याला चष्मा, जवळ फाईलीचे गठ्ठ, मागे दोन-चार सहाय्यक घेऊन आपापल्या खात्याविषयी बोलत होते. स्वतः मुख्यमंत्री ऐकत आहेत म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे तणावग्रस्त होते. विलासरावजी मात्र सहजतेने बसले होते. डोळ्यावर चष्मा नाही, कपाळावर आठ्या नाहीत, समोर कागदपत्रांचा, फायलींचा ढिगारा नाही. चार-पाच सचिवांचे सादरीकरण झाल्यावर ते एखादाच प्रश्न विचारीत. सचिवांच्या सादरीकरणावर त्यांनी चक्क आकडेवारीच्या चुकाही दाखवून दिल्या. त्यावेळची त्यांची प्रशासनावरची पकड, अफाट स्मरणशक्ती, शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती आणि समोरच्याचा अपमान न करता चूका दाखवण्याची पद्धती अतुलनीय होती. जेंव्हा आमचे लोकराज्य देशातील सर्वाधिक खपाचे मासिक ठरले. तेंव्हा संपादकीय पानावर नावे असलेल्या मुख्य संपादक ते मुद्रित शोधक अशा प्रत्येकाला बोलवून स्वतःची स्वाक्षरी असलेले पत्र देऊन आमचे अभिनंदन विलासरावजी देशमुख यांनी केले होते.देशातील पहिल्या सरकारी न्यूज पोर्टल चे उदघाटन झाल्यावर माझे काही सहकारी सभागृहाच्या दाराशी मुख्यमंत्री महोदयां सोबत फोटो घेण्यासाठी उभे होते. नेमके त्याच वेळी तिथून बाहेर पडताना विलारावजींनी मला हाक मारली, मी धावत तिकडे गेले, त्यावर ते हसून म्हणाले, अहो या इथे, उभे राहा. तुमच्या सगळ्यांबरोबर मला माझा फोटो हवा आहे. तेंव्हा आम्ही सारे सहकारी खुप खुश झालो होतो. विलासरावजीं सोबत मला काम करता आले. याचे समाधान वाटते.
- श्रद्धा बेलसरे- खारकर, निवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन